जिजाऊ संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा १ जून २०२५ रविवार रोजी संपन्न होणार .

जिजाऊ संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा १ जून २०२५ रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे यांनी आज रत्नागिरीत दिली. या पत्रकार परिषदेला जिजाऊचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्र मांडवकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.सेवाभावी तत्वावर मोफत चालविले जाणारे रत्नागिरीतील पहिले व महाराष्ट्रातील तिसरे रुग्णालय जनतेसाठी खुले होणार आहे.रत्नागिरीमध्ये खाजगी तत्वावर मात्र मोफत चालविल्या जाणार्‍या अद्यावत व सुसज्ज अशा रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न होणार आहे.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय प्रशस्त व सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानासहित तसेच तज्ञ डॉक्टर व आवश्यक असा प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफसह जनतेच्या सेवेला वाहून घेण्यासाठी सज्ज आहे, दिनांक १ जून श्री. निलेश सांबरे साहेबांच्या वडिलांचा म्हणजे श्री. भगवान महादेव सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील तसेच गरजू रुग्णाच्या आरोग्य सेवेसाठी हे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. जनरल सर्जरी, हृदयरोग विभाग, कॅन्सर विभाग, लॅब व डायग्नोसिस्ट सुविधा, बालरोग विभाग, यूरोलॉजी विभाग, स्त्रीरोग विभाग, नेत्ररोग विभाग, एडी मेडिसिन विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, न्यूरो विभाग आणि अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या मेडिकलमध्ये गोळ्या औषधे देखील मोफत मिळणार आहेत. जिजाऊ संस्थेमार्फत खाजगी तत्त्वावर मात्र मोफत चालविले जाणारे हे महाराष्ट्रातील तिसरे रुग्णालय आहे.

जिजाऊ संस्थेमार्फत पहिले रुग्णालय झडपोली ता. विक्रमगड, जि. पालघर म्हणजे श्री. निलेश सांबरे यांच्या मूळ गावी १३० खाटांचे अद्यावत व सुसज्ज असे रुग्णालय २०१४ पासून कार्यरत आहे. यानंतर सहा महिन्यापूर्वीच शहापुर, जि. ठाणे येथे देखील असेच अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे ग्रामीणच्या जनतेसाठी सुरू करण्यात आले आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण २८ आरोग्य क्लिनिक आहेत.आरोग्य व शिक्षण या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आहेत माणसाला चांगल्या आरोग्य सुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे मिळालेच पाहिजे यासाठी फक्त शासनावर अवलंबून राहून चालणार नाही तर आपली देखील सामाजिक जबाबदारी म्हणून आपण कमावलेल्या पैशातून हे प्रकल्प चालवले जावे व कुणीही व्यक्ती पैशाअभावी योग्य वैद्यकीय उपचारापासून वंचित राहता कामा नये व आर्थिक किंवा इतर कुठल्याही अडचणीमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी मी माझा पैसा साठवून सडवण्यापेक्षा समाजासाठी खर्च केल्याने मला अखंडित समाधान भेटते व हाच उदात्त हेतू ठेवून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सर्व सामाजिक कार्य सदैव करत असते असेही निलेश सांबरे यांनी सांगितले.

एवढेच नव्हे तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कोकणातील पाचही जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका २४ तास धावत आहेत, दरवर्षी २०० पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे, ५०० पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे व ३०० पेक्षा जास्त नेत्र तपासणी शिबिरे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात व हे कार्य अविरत चालूच आहे सर्व उपक्रमांचा लाभ आत्तापर्यंत जवळपास पाच लाख लोकांना झाला आहे तीन लाख पेक्षा जास्त लोकांना चष्मे वाटप करण्यात आलेले आहेत.जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक महिला सक्षमीकरण, सामाजिक व रोजगार बाबतीत कार्य गेल्या दीड वर्षापासून सुरू करण्यात आले व या दरम्यान अँब्युलन्स सेवा देखील सुरू करण्यात आली व यामुळे रत्नागिरी जिल्हा जनतेला आरोग्य सुविधासाठी कोल्हापूर व मुंबई या ठिकाणी वारंवार जावे लागते आणि या ठिकाणी जाणे व तिकडचा हॉस्पिटलचा खर्च सर्वांना परवडणारा नसतो यामुळे आरोग्य सुविधा व उपचाराशिवाय अनेक जणांना वंचित रहावे लागते आणि हीच समस्या समूळ नष्ट व्हावी, गोरगरीब जनतेला योग्य व तत्काळ उपचार मिळावा यासाठी चार महिन्यापूर्वी करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान वि. दा. सावरकर नाट्यगृहात आपण आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे मोफत रूग्णालय आपण चारच महिन्यात सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांनी कोणत्याही सांविधानिक पदावर नसताना किंवा रत्नागिरी जिल्ह्याचे साधे रहिवासी देखील नसताना फक्त सामाजिक जाणिवेतून या संवेदनशील व्यक्तित्वाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रत्नागिरीवासियांना दिलेले आश्वासन अगदी कमी काळात पूर्णत्वास आणले. श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयामुळे  रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून सर्वसामान्य रूग्णापासून अनेकांना या रूग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे. १ जून रोजी होणार्‍या या भव्य लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिजाऊ संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button