
नव्याने सुशोभिकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात यंदा पुन्हा गळती.
सध्या जिल्ह्यात धुवॉंधारने कोसळणार्या पावसाने सलग दुसर्या वर्षी येथील अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला दणका दिला. दर्शनी भागातील इमारतींच्या छत आणि क्लॉडिंगमधून पुन्हा पा गळती सुरू झाली आहे. त्यामुळे सुशोभिकरण कामाच्या गुणवत्तेवर येथील प्रवासीवर्गातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात वादळी पाऊस झाला होता. या पावसाने रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॉडिंगचे मोठे नुकसान झाले होते. सायंकाळच्या वेळेस त्यावेळी झालेल्या जोरदार वार्यामुळे टिनचे पत्रे उडून गेले आणि क्लॉडिंग कोसळले होते. यामुळे सुमारे १५ ते २० चौरस फूट छतावर परिणाम झाला होता. त्यावेळेस या रेल्वे स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वारावर सुरु असलेल्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते.
राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या सुशोभिकरण प्रकल्पाचे काम करण्यात आले होते. त्यादरम्यान संपूर्ण काम पूर्ण होण्यापूर्वीच छताचे नुकसान झाले होते.आता देखील गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरण केलेल्या इमारतीच्या कामाला पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिला आहे. इमारतीचा दर्शनी भाग आणि प्रवेशद्वाराच्या नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॉडिंगमधून गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा जोरदार पाणी गळती सुरू झाली. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या भागात साचणार्या पाण्यामुळे रेल्वे यंत्रणा देखील हैराण झाली आहे.