
जिंदाल गॅस प्रकल्पविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे धरणे…. जिल्हा प्रशासनाची धावपळ. कार्यवाहीबाबत दहा दिवसात उत्तर देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर धरणे मागे.
रत्नागिरीतालुक्यातील नांदिवडे येथील जिंदल गॅस टर्मिनल प्रकल्प स्थलांतरित करावा, प्रकल्पाचे काम बंद करावे, संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केबिनबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या धरणे आंदोलन केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आणि त्यामुळे अखेर अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर प्रहार जनशक्ती च्या पदाधिकाऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.जिंदाल गॅस टर्मिनल प्रकल्प हा तालुक्यातील नांदिवडे येथील भर वस्तीत उभारला जात आहे.
हा प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा पूर्णतः विरोध आहे. हा प्रकल्प येथून स्थलांतरित करावा यासाठी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या या लढ्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समर्थन देतानाच त्यांच्या बाजूने 28 तारखेला या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र 28 मे रोजी प्रहार दिव्यांग क्रांती सेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच नांदिवडे येथे उभारल्या जाणाऱ्या जिंदाल गॅस टर्मिनल प्रकल्पाबाबत ही चर्चा करण्यात आली.जिंदाल गॅस प्रकल्पावर कारवाईची मागणीजिंदाल गॅस टर्मिनल वरील चर्चेत बोलताना प्रहार जनशक्तीचा पदाधिकाऱ्यानी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की नांदिवडे येथे गॅस प्रकल्प उभारताना आवश्यक कागदपत्रांची जिंदाल कंपनीने पूर्तता केलेली नसल्याचे पत्र महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या प्र. उपसंचालकानी जिंदाल कंपनीला दिले आहे. त्याचप्रमाणे गॅस टर्मिनल चे काम थांबवण्याचे पत्रही जेएसडब्ल्यू पोर्टला देण्यात आले आहे. त्यानंतरही गॅस टर्मिनल प्रकल्पाचे काम सुरूच आहे. त्यामुळेपत्रानुसार गॅस प्रकल्पावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र त्यानंतर प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर ठिय्या धरणे धरून बसले. त्याचवेळी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह हे कार्यालयातून निघून गेल्यामुळे प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले आणि जिल्हाधिकारी जात असताना न्याय द्यावा, न्याय द्यावा, अशा घोषणा देण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला हा प्रकार रत्नागिरी शहर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आणि सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सूर्यवंशी आणि प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी ठिय्या दिलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच नांदिवडे येथील गॅस प्रकल्पाबाबत सर्व संबंधित विभागांकडून माहिती घेऊन येत्या दहा दिवसात आपल्याला उत्तर दिले जाईल असे लेखी पत्र चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिल्यानंतर प्रहार जनशक्ती च्या कार्यकर्त्यांनी हे ठिय्या धरणे मागे घेतले.यावेळी प्रहार जनशक्तीचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, कोकण विभाग सचिव सुरेश मोकल, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष काजल नाईक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी तसेच नांदिवडेचे माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.