
कळंबस्ते रेल्वे फाटक दिवसात ३४ वेळा ’अप-डाऊन, पुलाची मागणी.
कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटक असून हे फाटक दिवसभरात ३४ फेर्यांसाठी बंद ठेवावे लागते. याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी ३२ वर्षे केली जात आहे. त्याप्रमाणे सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्याप निधीची तरतूद होत नसल्याने चिपळूणसह खेड पंधरागावच्या प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे. तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटकाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे.
या फाटकामुळे चिपळूण व खेड तालुक्यातील २१ गावं अडचणीत आली आहेत. यामध्ये चिपळूण हद्दीतील कळंबस्ते, नवीन कोळकेवाडी, दळवटणे, खांदाटपाली, निरबाडे, मोरवणे तसेच खेड हद्दीतील आंबडस, चिरणी, भेलसई, केळणे, काडवली, कुंबवली, मुसाड, वावे, कुरवळ खेड, कुरवळ जावळी, धामणंद, कासई, सापिर्ती, तळवट पाली, चोरवणे आदी गावांमधील प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे. दिवसभरात १७ रेल्वे गाड्यांची ये-जा होत असल्याने एकूण ३४ फेर्या दररोज होतात. या प्रत्येक फेरीसाठी किमान १० ते १५ मिनिटे फाटक बंद ठेवला जातो. याशिवाय हंगामात जादा गाड्या सोडल्या जातात, तेव्हा तर दिवसभरात अनेकदा फाटक बंद केला जातो. या कालावधीत स्थानिक प्रवाशांचे व वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.www.konkantoday.com