
एमबीए सीईटीचा निकाल जाहीर; सात परीक्षार्थींनी १०० पर्सेंटाईल.
मुंबई :* व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीए) प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले आहेत. सहा सत्रात झालेल्या या परीक्षेत २८ प्रश्न चुकीचे आल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असे २८ गुण देण्यात आले होते. आता लवकरच सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या एमबीएच्या प्रवेश परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले.
हर्षिता पाण्डे, प्रथम सिंह, प्रतीक म्हात्रे, मुजैद खान, आर्ची बिंदाल, लक्षिता चंडालिया आणि शाश्वी शाह यांना शंभर पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाने बुधवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. सीईटी कक्षाने १ ते ३ एप्रिलदरम्यान सहा सत्रांमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते. तर २८ हजार १५० विद्यार्थी गैरहजर होते.परीक्षेनंतर सीईटी कक्षाने २८ ते ३० एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली होती. यावेळी राज्यभरातून २५३ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक १३४ तक्रारी लॉजिकल रिझनिंग, अबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या २१, क्वांटीटेटीव्ह ॲप्टिट्यूडच्या ३५ आणि व्हर्बल ॲबिलिटीच्या ३५ तक्रारी होत्या.
या तक्रारीची शहानिशा केल्यावर सहा सत्रांमध्ये २८ प्रश्न चुकीचे असल्याचे सीईटी कक्षाच्या तज्ज्ञांच्या लक्षात आले. त्याचे अनुषंगिक गुण देण्याचेही जाहीर करण्यात आले होते. चुकलेल्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक १० प्रश्न २ एप्रिल रोजीच्या सकाळच्या सत्रातील होते तर त्या खालोखाल ३ एप्रिलच्या दुपारच्या सत्रात ९ प्रश्न चुकले होते. निकालानंतर आता लवकरच एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात येईल.*गतवर्षी ४२ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश*गतवर्षी एमबीएच्या ५० हजार ५०१ जागांपैकी ४२ हजार २०७ जागांवर प्रवेश झाले. तर तब्बल ८ हजार २९४ जागा रिक्त राहिल्या होत्या. गतवर्षी एमबीएसाठी १ लाख ५२ हजार ९११ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी फक्त ४२ हजार २०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.