
नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावे. त्यांच्या टोपाचेही केस आता पिकले – संजय राऊत यांची राणेंवर टीका.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. मंगळवारी (27 मे) पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी शिवसेना उबठावर निशाणा साधला होता.त्यावर संजय राऊत यांनी ‘नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावे,’ असे म्हणत टोला लगावला आहे. तसेच, यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधलापाकिस्तान विरुद्ध दंड थोपटणारे नरेंद्र मोदी यांचे दंड पिचके आहेत का? असा सवाल शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना केला. “डोनाल्ड ट्रम्प यांनी दम भरताच भारतीय सैन्यांना परत का बोलावले? हे नारायण राणे यांनी आधी स्पष्ट करावे. पाक व्याप्त कश्मीर आम्ही ताब्यात घेणार, अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली होती. त्याचे उत्तर आधी नारायण राणे यांनी द्यावे. आम्ही पाकिस्तान मध्ये गेलो नाही. तर नरेंद्र मोदी हेच नवाज शरीफ यांचा केक कापण्यासाठी गेले होते. हे नारायण राणे विसरलात का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “नारायण राणे यांनी आता आपल्या वयाचे तरी भान ठेवावे. त्यांच्या टोपाचेही केस आता पिकले आहेत. त्यांनी प्रगल्भ विधाने करावीत.” अशा शब्दात त्यांनी टीका केली. “तुम्ही स्वतःचा पक्ष काढून दंडावरचा बेडूक दाखवला असता तर आम्ही तुम्हाला मानले असते. मात्र तुम्ही भाजपचे आश्रित आहात. तर राज ठाकरे यांच्याकडे स्वतःचा पक्ष आहे,” असे संजय राऊत पुढे म्हणाले.”एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र पक्ष नाही. तो अमित शहा यांचाच पक्ष आहे. त्यामुळे ही एकच थाळी आहे. यात सगळे मिळून खात आहेत. महाराष्ट्रातील सर्व लुटीचा माल वन विंडो सिस्टीमने एकाच ठिकाणी आणण्यात येतो.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कंपनीचे मालकदेखील अमित शहाच आहेत. त्यामुळे वाटाघाटा हे सर्व वरवर सुरू आहे. शेवटी ते सर्व एकाच ताटातले पदार्थ आहेत.” असे म्हणत संजय राऊतांनी टीका केली. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रॉपर्टी खरेदीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. “छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल वेदांताची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. ही जागा भ्रष्ट मार्गाने मंत्री शिरसाट यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली. 67 कोटी रुपयांना ही प्रॉपर्टी घेण्यात आली. गोरगरिबांना मदत करणाऱ्या खात्याच्या मंत्रांच्या मुलाकडे एवढे पैसे कसे आले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.