
अन्यथा मुंबई कार्यालयावर मोर्चा काढू, माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा.
जिल्ह्यात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. बीएसएनएलच्या ढीसाळ कारभारावरून ठाकरे शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी संबंधित अधिकार्यांना चांगलेच सुनावले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या बीएसएनएलच्या या समस्येत सुधारणा न झाल्यास मुंबई कार्यालयावर थेट मोर्चा काढण्याचा इशारा राऊत यांनी दिला.गुरूवारी राऊत यांच्या नेतृत्वाखाली बिघडलेल्या सेनेचा जाब विचारण्यासाठी येथील बीएसएनएलच्या मुख्यप्रबंधक कार्यालयावर शिवसैनिक धडकले. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनसकर, विभागप्रमुख विजय देसाई उपस्थित होते.
मुख्य प्रबंधक अमृता लेले, भोंगले, शिरसाट आदी बीएसएनएलचे अधिकारी या चर्चेवेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील बीएसएनएलची सेवा म्हणजे एखाद्या रूग्णाचे सर्व अवयव निकामी होवून तो व्हेंटीलेटरवर नेल्यासारखी आहे. जिल्ह्यातील बीएसएनएलचे १०६ टॉवर्सपैकी ४८ टॉवर बंद आहेत. काही ठिकाणी बॅटर्या नाहीत. महावितरणची जोडणी नाही. जनरेटरला डिझेल नाही. सोलर पॅनल नाहीत. बील न भरल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. अशी विदारक स्थिती असताना बीएसएनएल कंपनीकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे पाहून अधिकार्यांना चर्चेवेळी खडे बोल सुनावण्यात आले.www.konkantoday.com