
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायतींची तब्बल ३ कोटी पाणीपट्टी थकीत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून मार्चअखेरपर्यंत ८७.६७ टक्के म्हणजेच २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ७३९ रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही तब्बल ३ कोटी २ लाख ९० हजार ६८ रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे बाकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज, ग्रामपंचायत हद्दीतील अन्य विकासकामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात.
ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या ग्रामस्थांना पाइपलाइनद्वारे सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी पाणी दिले जाते. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून कर आकारणी केली जाते. जिल्हा परिषदेकडे आलेल्या पाणीपट्टीतून त्या-त्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी निधी वर्ग केला जातो. मात्र, काही ग्रामस्थ पाणीपट्टी वेळेवर भरत नसल्याने पाणीपट्टीची रक्कम थकीत राहते.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३ कोटी ५४ लाख ३६ हजार ५४४ रुपये पाणीपट्टी थकीत राहिली होती. तर वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात २१,०३,०५,२६३ रुपये इतकी वसुली अपेक्षित हाेती. त्यातील २१,५४,५१,७३९ रुपये इतकी वसुली झाली असून, अद्यापही ३,०२,९०,०६८ रुपयांची थकबाकी आहे.ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. मात्र, पाणीपट्टी वसुलीकडे ग्रामपंचायातींकडून दुर्लक्ष होत असल्याने थकीत रकमेचा आकडा वाढत आहे.