
राजापूरात अवकाळी पावसाची हजेरी , आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ.
राजापूर / – भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सकाळी साडेनउ च्या दरम्यान राजापूरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली . राजापूरात गुरुवारचा आठवडा बाजार असल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यापारी वर्गाची या अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडवली आहे . दरम्यान तालुक्याच्या अन्य ग्रामिण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचीही त्रेधातिरपिट उडाली आहे . तालुक्याच्या पुर्व भागातील सौंदळ , रायपाटण, पाचल , ओणी सह सर्वच परिसरात गुरुवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे . गुरुवारी सकाळपासुनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर साधारण साडेनउच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली .
गुरुवारी भरणारा आठवडा बाजार पाहता ग्रामिण भागातील ग्रामस्थ अगोटच्या खरेदीसाठी बाजारात दाखल झाले होते . त्यातच लग्नसराईचाजोर असल्याने बाजारात मोठ्याप्रमाणावर गर्दी होती . त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्राहकांसह व्यापारीवर्गाची चांगलीच धावपळ उडाली . आठवडा बाजारातील अनेक व्यापाऱ्यांचा माल पावसाने भिजल्याने त्याना काही प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे . अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आठवडा बाजार परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने ग्राहकाना चिखलातुन खरेदी करावी लागली आहे . साधारण अर्धा तास बरसलेल्या या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा पसरला असुन उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकाना काहीसे समाधान लाभले आहे.