
भारताकडून चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोन हल्ला.
भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत.भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोन हल्ला केला आहे.
पाकिस्तानाकडून रात्री ९ च्या आसपास जम्मू आणि आसपासच्या भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानने जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो त्वरित उधळून लावला. त्यानंतर राजौरी आणि पुंछमध्येही पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले. पाकिस्तान या कुरापतीमुळे जम्मू, काश्मीर, लेह, पंजाबमधील अमृतसर शहरात रात्री ९:०० ते सकाळी ५:०० पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासोबतच पंजाबच्या सीमावर्ती भागांमध्येही ब्लॅकआऊट लागू करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला केल्यानतंर पार्श्वभूमीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत परिस्थितीचा आढावा घेत आहेत.