चिपळुणात वाशिष्ठीचा पूल तोडला मात्र गणेश विसर्जनासाठी  विसर्जन घाट बांधण्यास टाळाटाळ.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल तोडण्यात येत आहे. पूल तोडल्यामुळे गणेश विसर्जनावेळी मोठी अडचण निर्माण होणार आहे. अधिकार्‍यांनी आश्वासने देऊनही विसर्जन घाट उभारणीबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्याने संतप्त झालेल्या माजी सभापती शौकत मुकादम यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग उपविभागावर धडक देत उपस्थित अधिकार्‍यांना धारेवर धरले. या नदीवर खेर्डी, मतेवाडी, काविळतळी, गांधीनगर कळंबस्ते अशा अनेक ठिकाणाहून गणपती विसर्जनसाठी येतात, येथे जाण्यासाठी पुलावरूनही मार्ग होता. मात्र आता हा जुना पूल तोडल्यामुळे नदीपात्रात जाण्यासाठी रस्ता नाही. बहादूरशेख व कळंबस्ते येथे गणपती विसर्जन घाट बांधण्यात येतील, असे आश्वासन महामार्गाच्या अधिकार्‍यांनी पूल तोडण्यापूर्वी दिले होते.

आता तीन-चार महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतानाही या विसर्जन घाटाचा पत्ता नाही. महामार्गाचे अधिकारी म्हणतात की, नगर परिषद विसर्जन घाट बांधणार आहे व नगर परिषद म्हणते ’महामार्ग’ बांधणार आहेत, अशी चालढकल केली जात आहे. यामुळे सोमवारी पंचायत समितीचे माजी सभापती मुकादम यांनी महामार्ग कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना जाब विचारताना येत्या ३ महिन्याच्या आत विसर्जन घाट झाला नाही तर याद राखा, असा इशारा दिला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button