कोकणात ठाकरेंची शिवसेना पुन्हा उभारी घेईल, माजी खासदार विनायक राऊत यांचे भाकीत.

सध्याचा काळ आव्हानात्मक आहे. येत्या काळात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीने काम करणार आहे. जनतेचे प्रश्न तळागाळात घेऊन जाऊन ते सोडविण्यावर आमचा भर असेल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते कामाला लागले आहेत. यामुळे आगामी काळात कोकणात आमचा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.  माजी खासदार विनायक राऊत सोमवारी चिपळूण दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा कामाला लागलो आहोत. पक्ष प्रमुखांनी आम्हाला जबाबदार्‍या वाटून दिल्या आहेत त्याप्रमाणे कामकाज सुरू आहेत. आम्ही राजापूरमध्ये पक्षाचे कार्यालय विरोधकांच्या ताब्यातून काढून घेतले.

रत्नागिरी, चिपळूणमध्ये नव्याने कार्यालय सुरू केले. या वेळी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळली. प्रत्येक तालुक्यात पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू होत आहेत. पक्षासाठी तळागाळापर्यंत काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना बळ देण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येणार्‍या काळात ठाकरे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते काम करणार आहेत. प्रत्येक तालुक्यात वेळ पडल्यास विभाग स्तरावर बैठक घेऊन तेथील जनतेचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेवर अन्याय होत आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकार्‍यांकडे गेल्यास कार्यकर्त्यांना अधिकार्‍यांनी सत्ताधार्‍यांप्रमाणेच मानसन्मान देणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष म्हणजे नगण्य नाही हे सुद्धा आम्ही येणार्‍या काळात अधिकार्‍यांना दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

लोकांना विरोधी पक्ष म्हणून सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पक्षाचे सर्व नेते एकत्र मिळून नेतृत्व करून जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून आतापर्यंत अनेकजण शिवसेनेच्या बळावर मोठे झाले. आता पक्ष अडचणीत असताना अनेकजण ठाकरेंची साथ सोडत असल्याची खंतही श्री. राऊत यांनी बोलून दाखवली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button