
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय नष्ट,हाफिज सईदचा मुलगा ताल्हा सईद याच्या नेतृत्वातील टॉप कमांडर्स मारले गेले
बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे भारतीय लष्कराने हल्ले केले. यामध्ये सर्वात मोठा हल्ला बहावलपूर येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं म्हटलंय, की “बहावलपूरचे संपूर्ण आकाश लालसर दिसत आहे. पोलीस आणि बचावपथके घटनास्थळी पोहोचली आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले आहेत. मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची पुष्टी झाली आहे.”
सोशल मीडियावर बहावलपूरमधील विध्वंसाचे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत. एका युवकाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, “भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले आहे. माझ्या बहावलपूर शहरावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला आहे. मौलाना मसूद अजहरच्या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.”हल्ल्यानंतर बहावलपूरमध्ये मदरसे रिकामे करण्यात आले असून मोठ्या संख्येने लोक रस्त्यांवर दिसून येत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक युवक म्हणतो, की सर्व मदरसे रिकामे करण्यात आले असून, मध्यरात्रीच अफवांचे वातावरण निर्माण झाले.
जैशचे मुख्यालय सुमारे 200 एकरमध्ये पसरलेले होते. ज्यात एक मशीद, शाळा, रुग्णालय, शेती फार्म आणि एक ट्रेनिंग कॅम्प होता. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हे मुख्यालय संपूर्णपणे नष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूरसह पीओकेमधील मुजफ्फराबाद, कोटली, बाघ, मुरीदके, गुलपूर, महमूना, जोया आणि बिबर येथे भारतीय फाइटर जेट्सनी हल्ले केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला क्षेपणास्त्र हल्ला रात्री १२:३० वाजता करण्यात आला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा खात्मा झाला असून, हाफिज सईदचा मुलगा ताल्हा सईद याच्या नेतृत्वातील टॉप कमांडर्स मारले गेले आहेत.