*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी (दि.५) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी (दि.५) दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता लागली आहे.राज्य मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येईल.

त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.ऑनलाईन निकालानंतर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ ते २० मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button