
कापसाळ ग्रामपंचायतीने विरोध करूनही महावितरणच्यावतीने स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम सुरू.
चिपळूण महावितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर घरोघरी बसविले जात आहेत. या नवीन डिजिटल मीटरची अनामत रक्कम आणि त्यानंतर येणारी वीजबिले (रिचार्ज) या गोष्टी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना परवडणार्या नसल्याची भीती व्यक्त करत कापसाळ ग्रामपंचायतीने थेट या प्रक्रियेला कडाडून विरोध केला होता. हे मीटर गावात बसवू नयेत, अशा प्रकारचा ठराव करून लेखी निवेदनही महावितरण कंपनीला दिले होते. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखवित महावितरणने शुक्रवारपासून कापसाळ गावात स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम सुरू केल्याने सरपंच सुनिल गोरिवले यांच्यासह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकार्यांनी हे काम तातडीने थांबवावे, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा श्री. गोरिवले यांनी दिला आहे.www.konkantoday.com