
जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?”; -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.
मोदी सरकारने बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्र सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. सीसीपीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली.मोठ्या कालावधीपासून विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. या निर्णयाचे काही विरोधकांनी स्वागत केले. पण काहींनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना सवाल केला.जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे”, असे रोखठोक मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.