एकनाथ शिंदे , मंत्री उदय सामंत, आ.नीलेश राणे व सभेच्या आयोजकांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी- माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी

काश्मिरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीयांनी आम्ही केंद्र शासनासोबत असल्याची ग्वाही पंतप्रधानांना दिली.या घटनेने देश दु:खात असताना महाराष्ट्राचे जबाबदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळात जल्लोष सभा घेत हारतुरे स्वीकारले, फटाक्यांची आतषबाजी केली. एकीकडेते पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देण्यासाठी जातात तर दुसरीकडे स्वत:चा टेंभा मिरविण्यासाठी श्रीनगर ते गोवा-कुडाळ प्रवास करत आल्याचे सांगत स्वत:चे गुणगान गातात. त्यांच्या या असंवेनदशील वृत्तीला काय म्हणावे? अशा शब्दात ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी खा. विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.कणकवली शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते. विनायक राऊत म्हणाले, पहलगाम हल्ल्यामुळे अख्खा देश चिंतेत,दु:खात बुडालेला असताना तसेच महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याने त्यांचे नातेवाईक आक्रोश करत असताना राज्याचे नेतृत्व करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळात सभेत हारतुरे स्वीकारून आणि जल्लोष करून जे कृत्य केले आहे ते अशोभनीय आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 वा. नंतर जाहीर सभा व ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही, असे असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार सभेमध्ये रात्रौ 11.35 वा.पर्यंत ध्वनीक्षेपकावरून जाहीर भाषण केलेे. त्यामुळे ना. शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर व्यासपीठावरील प्रमुख नेते मंडळी, मंत्री उदय सामंत, आ.नीलेश राणे व सभेच्या आयोजकांवरही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी या पत्राद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले. विनायक राऊत म्हणाले, कुडाळच्या सभेत जिल्हावासीयांनी एकनाथ शिंदे यांना ठेंगा दाखविला, सुरूवातीपासुनच खुर्च्या उचलून ठेवण्याची नामुष्की आयोजकांवर आली. जेमतेम 400 लोकांच्या उपस्थितीत सभा झाल्याचा दावा त्यांनी केला.विनायक राऊत म्हणाले, कुडाळ येथील सभा रात्री संपल्यानंतर काही मंडळी कणकवलीत आली आणि त्यानंतर रंगीत पार्टीही झाली. दहशतवादी हल्ला होवून तीन दिवसही झाले नसताना कुडाळात रात्री सभा घेवून जल्लोष करण्यात आला, या प्रवृत्तीची माणसे महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत राज्याचे भले कसे होणार? जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ध्वनीक्षेपकाच्या नियमबाह्य वापराबाबत आयोजक आणि पाहुण्यांवर कडक कारवाई करावी असे आपण पत्र दिले आहे. पोलिस अधीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button