
दुकानदाराकडून सामान खरेदी करताना त्यांच्या धर्माची विचारणा करावी-मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे.नितेश राणे यांनी हिंदूंना आवाहन केले आहे की, दुकानदाराकडून सामान खरेदी करताना त्यांच्या धर्माची विचारणा करावी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील एका जनसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘दहशतवादी हल्लेखोरांनी मारण्याआधी धर्म विचारला, म्हणून आता हिंदूंनीही कोणत्याही दुकानदाराकडून खरेदी करताना त्यांच्या धर्माची चौकशी करावी.’ त्यांनी पुढे सांगितले, ‘जर दुकानदार हिंदू असल्याचे सांगत असेल, तर त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा. जर त्याला चालीसा म्हणता आली नाही, तर त्याच्याकडून खरेदी करू नका.’२२ एप्रिलला दक्षिण काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला.
या भीषण हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करण्यापूर्वी त्यांचे नाव आणि धर्म विचारले. तसेच, काहींना ‘कलमा’ म्हणायला लावण्यात आले आणि जे म्हणू शकले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली.या क्रूर हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर देखील जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यावर टीका केली आहे.