
कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे.कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे. वंदन करायला आलो आहे. आपल्याला धन्यवाद द्यायला आलो आहे. या ठिकाणी महायुतीला विजयी करा हे आवाहन मी केले आणि ते आपण करून दाखवले. कोकणात विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या उबठाची मशाल कायमची विझवून टाकली.
त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. असेच प्रेम शिवसेनेवर ठेवा असे आवाहन शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर झालेल्या आभार यात्रा सभेत ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गच्या जनतेने महायुतीला भरघोस मताधिक्य दिले. जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी शिवसेनेच्या दोन आमदाराना मतदारांनी कौल दिला. त्यामुळे या मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार यात्रेच्या माध्यमातून कुडाळ येथे आले होते. कुडाळ एसटी डेपो मैदानावर ही आभार यात्रा सभा झाली. पहेलगाम येथे अतिरेक्याचा हल्ला झाला. त्यात महाराष्ट्रातील पर्यटक मृत्युमुखी पडले. तसेच काही पर्यटक तिथे अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे बुधवारी रात्रीपासून काश्मीर मध्ये गेले होते. त्या ठिकाणाहून ते थेट गुरुवारी मोपा विमानतळावर उतरले. रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांचे सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी त्यांचे शिवसनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आल्याबरोबर लगेच त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, बाळा चिंदरकर, संजय आंग्रे, दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, संजू परब, वर्षा कुडाळकर, ऍड. नीता कवीटकर, संजय पडते, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, दीप्ती पडते, सौ. साक्षी परब, अपूर्वा सामंत,अशोक दळवी, महेश कांदळगावकर, प्रेमानंद देसाई, संजू परब उपस्थित होते.एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मी काश्मीरमध्ये लोकांच्या मदतीसाठी मध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस आल्यासारखे वाटले. त्यांना धीर आला. विरोधक टीका करतात पण संकटसमई त्या ठिकाणी जायचे नाही तर मग कधी जायचे. तिकडे अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या. त्यांना विश्वास आला की आता आम्ही सुरक्षितपणे आमच्या घरी जाऊ शकतो. आणि तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप माघारी आणू शकलो.
पहेलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा खरे म्हणजे हा कुठल्या व्यक्तीवर नाही देशावर झालेला हल्ला आहे आणि याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची भावना आहे. हा नवा भारत आहे. घुसके मारेंगे असे सांगून आर पार घुसवणारा भारत आहे. त्यामुळे या ठिकाणी जशास तसे उत्तर त्यांना पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.कोकण बद्दल बोलताना श्री. शिंदे म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखे वाटते. तसा अनुभव या ठिकाणी येतो आणि म्हणून हा भगवा इथे डौलाने फडकतो आहे.
या भगव्यासाठी जान कुरबान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत. आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे. निलेश राणे हे फणसासारखे आहेत. बाहेरून कठोर दिसत असले तरी आतून प्रेमळ आणि गोड आहेत. शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेला आहे. स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे. या कोकणामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. या कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे.