
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी ते अतिरेकी भारतीयांना बोल लावत होते, वडिलांना काकांना गोळ्या घातल्या दहशतवादी हल्ल्याला सामोरे गेलेल्या जगदाळेंनी सांगितली प्रत्यक्ष घटना
पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास गोळीबार झाला. पर्यटकांवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असून यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.हल्ल्यातील जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर रुग्णांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला रवाना झाले आहेत. जखमींमध्ये पुण्यातील जगदाळे कुटुंब देखील आहे. याच कुटुंबातील आसावरी जगदाळे हिने या हल्ल्याचा ऑंखो देखा हाल एका वृत्तसंस्थेला सांगितला.ती म्हणाली, मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेताब व्हॅलीमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो. तिकडे घोड्यांवरून जावे लागते. दुपारी आम्ही तिकडे जायला निघालेलो असताना वाटेतच दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना आमच्या डोळ्यासमोर गोळ्या घातल्या. माझ्या बाबांचे मित्रही आमच्यासोबत होते. त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. दोघेही गंभीर जखमी आहेत. त्यांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर आमची – मी, आई आणि काकू यांची व्यवस्था लष्कराच्या क्लब हाऊसमध्ये करण्यात आल्याचे घाबरलेल्या आसावरीने सांगितले.
आसावरी जगदाळे, तिची आई प्रगती जगदाळे आणि वडील संतोष जगदाळे हे त्यांचे मित्र कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गनबोटे यांच्यासह पहलगाम येथे फिरायला गेले होते. आसावरी म्हणते, “बेताब व्हॅली म्हणून पर्यटन स्थळ आहे. तिथे मिनी स्वित्झर्लंड नावाची जागा आहे, मोकळं पठार आहे. जिकडून स्वित्झर्लंडसारखे बर्फांनी भरलेले डोंगर दिसतात. तेथील स्थानिक पोशाख करून तिथे फोटो काढले जातात. तिथे पर्यटकांची गर्दी असते. तिकडेच आम्ही घोड्यावरून गेलो होतो. तिकडे शेकडो पर्यटक होते. अचानक गोळीबार झाला. पोलिसांच्या वेशातच काही दहशतवादी बाजूच्या टेकड्यांवरून उतरताना दिसले. त्यामुळे आम्ही ताबडतोब जवळच्या तंबूंमध्ये आसरा घेण्यासाठी गेलो. तिथे आधीपासूनच आमच्यासारखे 6 ते 7 पर्यटक लपून बसले होते. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हा गोळीबार सुरू असेल असं समजून त्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही जमिनीवर आडवे झालो.
मात्र, ते दहशतवादी तंबूजवळ आले आणि तिथे गोळीबार केला. त्यानंतर ते आमच्या तंबूपाशी आले आणि त्यांनी माझ्या बाबांना बाहेर बोलावल्याचे आसावरीने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्यासाठी ते भारतीयांना बोल लावत होते. तसेच आम्ही निष्पाप लोक, महिला आणि मुलांना काही करत नसल्याचे सांगत आमची बदनामी केली जात असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी वडिलांना अजान म्हणायला लावली. पण ते म्हणू न शकल्याने त्यांनी बाबांना 3 गोळ्या घातल्या. एक डोक्यात, एक कानाच्या मागे आणि एक पाठीत, अशी माहिती आसावरीने दिली. माझे काका देखील माझ्या बाजूला होते. दहशतवाद्यांनी त्यांना देखील 4 – 5 गोळ्या घातल्या.
यासोबतच त्यांनी तिथे असलेल्या अनेक पुरुषांना गोळ्या घातल्या आणि तिथे मदतीसाठी कोणीही नव्हते. पोलिसही नाहीत आणि लष्करही. पहिली मदत पोहोचली ती 20 मिनिटांनी आली