
जनतेला गाफिल ठेवून शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षणशक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर मारण्याचा घाट-पर्यावरण प्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर
जनतेला गाफिल ठेवून शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण करून नीस (सर्व्हेची खूण दर्शवणारी निशाण) लावण्यात आले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजित रस्त्यामुळे बेसुमार वृक्षतोड होईल, अशी भीती पर्यावरण प्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.याबाबत ते म्हणाले, जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर मारण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. त्याद़ृष्टीने या सहापदरी महामार्गाचा सर्व्हे सुरू झाला आहे. सदर महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी नीस लावण्यात येत आहेत.
शंभर मीटर रूंदीच्या या महामार्गासाठी लाखो वृक्ष तोडले जाणार आहेत. आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे.त्यात या महामार्गासाठी होणारी वृक्षतोड या जैवविविधता असणार्या निसर्गासाठी मृत्यूची घंटा ठरेल, यात वाद नाही. सह्याद्री पट्ट्यातील आणि पायथ्याशी असलेल्या या गावांमध्येच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि शेती बागायतीच्या पाण्याचे स्त्रोत बंद होऊन मोठी समस्या भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.एवढ्या मोठ्या वृक्षतोडीमुळे हत्ती, गवेरेडे, माकडं, सांबर यांचा जो त्रास शेती बागायती करणार्या शेतकर्यांना होत आहे तो कित्येक पटीने वाढणार आहे, अशी भीती डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केली आहे. मूठभर कंत्राटदार आणि सत्ताधार्यांचे उखळ पांढरे करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक असल्याचा दावा, डॉ.जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.परुळेकर म्हणाले, गेळे, आंबोली, पारपोली, वेर्ले, नेने, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. यापैकी बहुतेक गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, तसेच हा वाईल्ड लाईफ कॉरिडोरचा अविभाज्य भाग आहे.