
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजीबरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार नवा आकृतीबंध तयार करण्यात आला असून कोणत्या शैक्षणिक वर्षात कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे.याशिवाय इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजीबरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी व त्या शाळेची माध्यम भाषा शिकवण्याचेही धोरण निश्चित झाले आहे. त्याची अंमलबजावणी २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.राज्य शासनाने बुधवारी (ता. १४) काढलेल्या आदेशानुसार सुधारित आकृतीबंध, नवीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी, भाषाविषयक धोरण, अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास, पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य, विषय योजना, मूल्यमापन आणि शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियेाजन, या बाबींसंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दरम्यान, नवीन आकृतीबंधानुसार तीन ते आठ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बालवाटिका एक, दोन, तीन आणि इयत्ता पहिली व दुसरी असा पयाभूत स्तर निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने अंगणवाड्या आता जिल्हा परिषद शाळांना जोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचा अंतिम निर्माण अजूनही झालेला नाही, पण भविष्यात हा बदल होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.