
कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल.
रत्नागिरी : जवळपास सर्वच शाळांच्या परीक्षांचा हंगाम आटोपत आला असून, आता उन्हाळी हंगाम सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येत असून कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस ११ एप्रिल ते २३ मे २०२५ या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १२ एप्रिल ते २४ मे या कालावधीत करमाळी येथून सुटणार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी या स्थानकांवर थांबेल.
या गाडीचे एकूण २२ एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल. यातील लो. टिळक टर्मिनस ते करमाळी या फेरीसाठीचे आरक्षण आजपासून म्हणजेच ८ एप्रिलपासून खुले झाले आहे. प्रवाशांना या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.