जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग सावधगिरी लस तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करुन आठ दिवसात रुपरेषा करा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि.7 : कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर शिबीरे आयोजित करावीत, त्यासाठी आठ दिवसात रुपरेषा तयार करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या डॉ. समिधा गोरे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन करताना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची मदत घ्या. 9 ते 14 वयोगटातील विद्यार्थींनीची संख्या मिळू शकेल. त्याचबरोबर महिलांची संख्या किती आहे, तेही या शिबीराच्या माध्यमातून मिळू शकेल. 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी लसीचे 2 डोस तसेच 15 वयोगटापुढे 3 डोस देण्यात येतात.

नगरपरिषदेने मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी डॉयलेसीस युनिट सुरु करण्याबाबत सुस्थितीतील गाळे उपलब्ध करुन द्यावेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी पाण्याची सुविधा द्यावी. जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी चांगली रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी.

ठाणे महापालिकेच्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यासाठी मॅमोग्राफी व्हॅन खरेदी करा. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना दिली. अडीच कोटींची औषधी आणि दोन कोटींमधून व्हॅन घ्यावी, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉ. गोरे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर सिंधुरत्न योजनेमधून आरोग्यासाठीही मदत मिळावी, याबाबत शासनाकडे शिफारस करावी.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button