
कोकणात जाण्यासाठी तिसरा पर्याय उपलब्ध होणार मुंबई ते गोवा जलमार्गाने रोरो सर्विस द्वारे जोडण्यात येणार
मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याचवेळी या दोन मार्गांना लवकरच जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे.मुंबई ते गोवा रो रो सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी एमएमआर प्रदेशात जल वाहतुकीची घोषणा केली आहे. या भागात एका बाजूला खाडी आहे तर एका बाजूला समुद्र आहे. हे लक्षात घेता जलवाहतुकीची घोषणा करण्यात आली होती. 15-20 जेट्टींचे कामही पूर्ण झाले आहे. मीरा-भाईंदर पासून वसई-विरारपर्यंत रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. आता मुंबई ते गोवा रो रो सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सरनाईक यांनी सांगितलं.
मुंबईहून गोव्याला जाणारा महामार्गाचं काम अजूनही रखडलेलं आहे.खराब रस्त्यामु्ळे या मार्गावरुन जाणे ही वाहनचालक आणि प्रवाशांची परीक्षा असते. रेल्वेची अपुरी तिकीटं आणि महागडा विमान प्रवास हे दोन मार्ग उपलब्ध आहेत.त्या परिस्थितीमध्ये मुंबई-गोवा हा जलमार्ग वाहतुकीसाठी सुरु झाला तर त्याचा सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या मुंबईहून अलिबागला रो-रो सेवा सुरु आहे. त्यामध्ये बोटीतून वाहनं नेण्याची सोय आहे त्याचा अलिबागच्या किनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा फायदा होतो. याच पद्धतीची रो-रो सेवा मुंबईहून गोव्याला झाली तर त्याचाही मुंबईकरांना फायदा होणार असून गोव्याच्या पर्यटनालाही यामुळे फायदा होणार आहे.मुंबई-गोवा रो-रो सेवा ही या दोन भागांच्या वाहतुकीप्रमाणेच कोकणासाठी देखील उपयोगी ठरणार आहे. ही सेवा विना-थांबा न करता त्याचे अलिबाग, रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबे दिले तर त्याचा कोकणात जाणाऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. मात्र यासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे