
कोल्हापूरात मुसळधार पावसाने जनजीवन थंडावले पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट १ इंचावर
कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट १ इंचांवर गेली आहे. त्यामुळे आता जितकी पाण्याची पातळी वाढत जाईल तितकं पाणी कोल्हापूर शहराच्या आणि महामार्गावर सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. पुरग्रस्त भागातून स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांची पुरसदृश्य स्थिती असल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यांयी मार्गांनी वाहतूक सुरु आहे.