
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – जिल्ह्यातील पहिली रेल्वे जाणार 26 एप्रिलला आयोध्येकडे पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी देणार उपस्थित राहून यात्रेसाठी शुभेच्छा.
रत्नागिरी, : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ 800 नागरिकांना मिळाला असून, 26 एप्रिल रोजी ही रेल्वे प्रभू श्री राम जन्मभूमी असणाऱ्या अयोध्याकडे धावणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या प्रमुख सोहळ्यास पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्य मंत्री योगेश कदम, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले होते. त्याला जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठीची ही पहिली रेल्वे 26 एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 26 एप्रिल रोजी राजापूर रोड येथून सुरु होणाऱ्या या तीर्थ दर्शन यात्रा प्रवासाचा मुख्य सोहळा रत्नागिरी रेल्वे स्थानकावर होणार आहे. 000