
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून प्रवास अंधारातूनच.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून शिमगोत्सवापासून प्रवास सुसाट झाला असला तरी वीजपुरवठ्याचे त्रांगडे अद्याप कायम आहे. वीजपुरवठ्यात येणार्या व्यत्ययामुळे दोन्ही बोगद्यातून वाहनचालकांना अंधारातूनच वाहने हाकावी लागत असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे. दोन्ही बोगद्यात आता वीजपुरवठ्याचा नवा अडथळा वाहनचालकांच्या मार्गात उभा ठाकला आहे.यापूर्वी ऐनकैन कारणांनी चर्चेत राहिलेल्या कशेडीच्या दोन्ही बोगद्यात आता वीजपुरवठ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे.
कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे ११ केव्ही क्षमतेच्या विजेची मागणी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे केल्यानंतर त्यापोटी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याने दोन्ही बोगद्यात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देत शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले करण्यात आले होते.www.konkantoday.com