
एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज.
मुंबईकर उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचे प्लॅनिंग करू लागले आहेत. या अनुषंगाने एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाले आहे.राज्यभर 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळय़ातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.उन्हाळी सुट्टीत मुंबईहून कोकण तसेच राज्याच्या इतर भागांत जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असते. एकीकडे रेल्वेने अतिरिक्त सेवा सुरू केली तरी राज्याच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी लाल परीला पसंती देतात.
प्रवाशांचा हा कल एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकू शकतो, या अनुषंगाने महामंडळाने एप्रिल आणि मे महिन्यात 872 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा समावेश असणार आहे. मुंबई सेंट्रल व परळ आगारातूनही अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
शिवशाही बसची सेवा मुंबईतून राज्यभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव, बीड, नागपूर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. उन्हाळी सुट्टीत खासगी ट्रव्हल्सवाले प्रवाशांकडून भरमसाट पैसे उकळतात. अशा परिस्थितीत अनेक प्रवासी एसटी बसेसकडे वळतात. त्यामुळे अतिरिक्त शिवशाही बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.