
मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट
_काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवारपासून पावसाने आणखीच जोर पकडला असून आज रविवारी देखील राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.आयएमडीने आज रविवारी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच गरज असल्यास तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.राज्यभरात पुढील ४ दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहील, असं हवामानतज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी सांगितलं आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत मराठवाडा तसेच विदर्भात तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर वाशिम तसेच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून येत्या 3-4 तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलंय.