
रत्नागिरीतील दोनजणांविरुद्ध तडीपारीची कारवाई.
रत्नागिरी : जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू असून, चालू वर्षात दोघांवर तडीपारीची कारवाई केली आहे. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे जि. रत्नागिरी) आणि सफी उल्ला समिर सोलकर (रा. कोकणनगर रत्नागिरी) या दोघांनाही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पोलीस ठाणे अभिलेखावर असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी तडीपारीची कारवाई करण्यात येत असते. यामध्ये अंमली पदार्थासंबंधित गुन्हे, शरीराविषयी गुन्हे, मालमत्तेविषयी गुन्हे व इतर गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून एकूण ७ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कार्यवाही करण्यात आली असून, सन २०२५ मध्ये आजपर्यंत २ सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कार्यवाही केली आहे.
स्वप्नील पाचकुडे आणि सफी उल्ला सोलकर या दोघांनाही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.दरम्यान, जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुध्द यापुढेही तडीपारीची कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.