कंत्राटी शिक्षकांचे १७ मार्च रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन, जिल्ह्यातील ५०० शिक्षक सहभागी होणार

*कंत्राटी शिक्षक रद्द करण्याच्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करावा

रत्नागिरी : कंत्राटी शिक्षक भरतीबाबत शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक डीएड, बीएडधारक १७ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असून, यात जिल्ह्यातील ५०० शिक्षक सहभागी होणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये कंत्राटी तत्त्वावरती ६७२ शिक्षकांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हा परिषदेने केली होती. या जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते.

अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे येथील शैक्षणिक व्यवस्था बिघडली होती. ही शैक्षणिक परिस्थिती टिकवण्याचे काम स्थानिक डीएड, बीएडधारक आणि पदवीधर शिक्षक यांनी केले होते. ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ४९५ शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे या सर्व शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार आहेत. ज्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्था वाचवली अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत असल्याकारणाने रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक मुंबईतील आझाद मैदान येथे दिनांक १७ मार्च रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ व अति दुर्गम भागामध्ये वसलेला आहे. या जिल्ह्यातील अनेक शाळा या वाडी-वस्तीवर डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर कंत्राटी शिक्षक शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मोठा परिणाम होणार असून, या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. अनेक शाळा शून्य शिक्षिकी आहेत. दरवर्षी या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलीने जाणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे इथल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.कोकणातील डोंगराळ भागाचा विचार करता तात्काळ पर्यायी शैक्षणिक व्यवस्था म्हणून कंत्राटी शासन निर्णय हा उत्तम पर्याय होता आणि आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

कंत्राटी शिक्षक भरतीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला याचा मोठा फायदा झाला आहे. छोट्या छोट्या शाळातील मुलांच्या प्रगतीवर याचा चांगला परिणाम दिसून येत आहे त्यामुळे हा शासन निर्णय टिकला पाहिजे. नियुक्ती दिलेल्या सर्व ४९५ शिक्षकांना कार्यमुक्त न करता कायम ठेवण्यात यावे.कंत्राटी शिक्षक संघटना जिल्हाअध्यक्ष सुदर्शन मोहिते, अजिंक्य पावसकर (संगमेश्वर) संजय कुळये (रत्नागिरी) गिरीश जाधव (रत्नागिरी) रुपेश झोरे (लांजा) मृदुला देसाई (लांजा)विनोद कांबळे ( राजापूर)शेफाली पेणकर (राजापूर)प्रज्ञा कदम (चिपळूण) अमोल सावर्डेकर (चिपळूण) रुपाली वाघे (गुहागर) सुशांत मुंडेकर (गुहागर) योगेश तांबे ( खेड) श्रेया कापसे ( खेड) आरती तांबे ( दापोली) प्रिया गमरे (मंडणगड) यांच्यासह जिल्ह्यातील ५०० शिक्षक या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button