
निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाई शासन मागतेय परत
दापोली : तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळातील नुकसान झालेल्या नागरिकांकडून शासन दिलेली रक्कम परत मागत असून ती रक्कम नागरिकांनी परत न केल्यास त्यांच्या घरांवर शासकीय बोजा किंवा जमिनीचा लिलाव होईल, अशी नोटीस निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या आडे येथील नागरिकांना शासनाने दिली आहे. येथील नुकसानग्रस्त यांना नुकसानभरपाई म्हणून शासनाने 1 लाख 60 हजार इतकी रक्कम ही शासकीय सर्वेक्षण करून लाभार्थी यांच्या खात्यात जमा केली होती. मात्र दिलेली रक्कम ही अतिरिक्त आहे, असे आता शासन सांगत आहे.
आडे येथील समुद्र किनारी असणार्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाची पाहणी करून शासनाने त्यांना 1 लाख 60 हजार अनुदान दिले त्या पैशातून या नुकसानग्रस्तांनी आपल्या घराची दुरुस्ती केली. मात्र या घरांचे पूर्णतः नुकसान झाले नाही, अशी तक्रार या घरांबाबत आली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियर यांनी या घराचे फेर सर्वेक्षण केले. त्यानुसार फक्त 60 हजारांचे नुकसान झाले आहे. असा रिपोर्ट शासनाला दिला त्यानुसार या नुकसानग्रस्तांनी उर्वरित 1 लाख शासनाला परत करावेत, असे शासन सांगत आहे. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून आम्हाला आता आत्महत्या करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, असा पवित्रा या नागरिकांनी घेतला आहे. याबाबत माजी आमदार संजय कदम यांनी या नागरिकांसह दापोली प्रांत अधिकारी शरद पवार आणि दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. भरपाईबाबतकाहीतरी मार्ग काढून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी प्रशासन यांच्याकडे केली आहे.