
रत्नागिरी जिल्ह्यात पावणेतीन लाख विद्यार्थ्यांची तपासणी
बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अंगणवाडी आणि शाळांमधील १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ७३ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली.त्यातील २६,१७१ बालकांना शालेय स्तरावर उपचार उपलब्ध करून देण्यात आले तर ७,५७२ मुलांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १ एप्रिल २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करुन उपचार करणे हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि औषध निर्माता यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली आहेत.