
भाट्ये येथे दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा उपचार्याच्या दरम्याने मृत्यू
रत्नागिरी शहरालगत असलेल्या भाट्ये परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इलेक्ट्रीक दुचाकीच्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुसर्या दुचाकीच्या चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फणसोप ते रत्नागिरी रस्त्यावरील भाट्ये येथील नझीर उस्मान वाडकर यांच्या घरासमोर घडली.
अख्तर यासिन साखरकर (वय ३८, रा. नवानगर भाट्ये, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. साखरकर आपल्या ताब्यातील (एमएच-०८ एयू-९४७५) या दुचाकीवरून पत्नी वफा आणि मुलगा मोहम्मद यांना घेऊन फणसोप ते रत्नागिरीकडे येत होते.
भाट्ये येथे नजीर वाडकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर आले असता, संशयित अख्तर साखरकर याने आपल्या दुचाकीचा वेग नियंत्रित न ठेवता, समोरून येणार्या प्रशिल सुनील साळवी यांच्या इलेक्ट्रीक दुचाकीला (एमएच-०८ बीएफ-३२८५) डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे प्रशिल साळवी रस्त्यावर पडून बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात संशयित चालकाच्या मागे बसलेल्या त्यांची पत्नी व मुलगा यांनाही लहान-मोठी दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com




