
कोराडीतील 600 मेगावॉटचा संच बंद!!
राज्यातील काही भागात उकाडा वाढला असतांनाच दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ तांत्रिक कारणाने (१४ मे) पासून बंद पडला आहे. राज्यात विजेची मागणी अचानक वाढल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता आहे.राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत असून काही भागात चांगलेच उन्ह तापत आहे. अवकाळी पाऊस पडणाऱ्या भागातही दुपारी चांगलाच उन्ह पडत असून रात्री अधून- मधून पाऊस पडतो. उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र पंखे, वातानुकुलीत यंत्रासह विद्युत उपकरणांचा वापर वाढला. दरम्यान राज्यात अधून- मधून अचानक विजेची मागणी वाढताना दिसत आहे.दरम्यान महानिर्मितीच्या नागपुरातील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक ८ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे १४ मे रोजी बंद पडला. संच बंद पडल्याने येथील वीज निर्मिती सुमारे ६०० मेगावॉटने कमी झाली. त्यामुळे रोजच्या १ हजार ९०० मेगावॉट ऐवजी सध्या येथे १ हजार ३१२ मेगावॉटच वीज निर्मिती होत आहे. संच दुरूस्तीला आणखी काही दिवस लागणार आहेत. दरम्यान राज्यात शुक्रवारी (१७ मे) विजेची मागणी सुमारे २७ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यापैकी २३ हजार ७०० हजार मेगावॉटची मागणी फक्त महावितरणची होती. मुंबईचीही मागणी ४ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. दोन दिवसांत हा संच सुरू होणार असल्याचा दावा महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने केला आहे. तर महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सध्या मागणी कमी असून आवश्यक वीज उपलब्ध असल्याचे सांगितले.www.konkantoday.com