
वैभव नाईक उद्धव ठाकरेंच्या भेटीला
कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे दोन शिलेदार ठाकरेंकडे राहिले आहेत.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेशिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंच्यासोबत कायम राहिले. विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निलेश राणे यांनी पराभव केला. त्यात वैभव नाईक यांच्या मागे मागील काही दिवसांपासून एसीबी चौकशी ससेमीरा मागे लागला आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर टीका केली होती. नाईक म्हणाले होते की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र, आपण 2019 ला त्यांच्याशी आघाडी करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. आत्ता त्यांनी दिल्लीत केलेल्या सत्कारावरून त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. पक्ष वाढीसाठी लक्ष द्या असा सल्ला देखील नाईक यांनी दिला होता.
विधानसभा निवडणुकीत कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीनंतर देखील पक्षातून नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे कोकणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. कोकणातील डॅमेज कंट्रोल विषयी ते वैभव नाईक यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच कोकणातील मैदावरील वास्तव नाईक ठाकरेंना सांगण्याची शक्यता आहे.