
रिक्षा – टॅक्सी चालकांना 10000 रुपये मिळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.
महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.हे मंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच 65 वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10 हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे.
त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहेकल्याणकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, 27 जानेवारी 2025 रोजी आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी देऊन यामहामंडळाची सुरुवात केली.
भविष्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.राज्यभरातील सर्व रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना 500 रुपये नोंदणी शुल्क आणि 300 रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासद नोंदणी करता येईल. स्वतः च्या मोबाईलवरून देखील त्यांना ते सहज शक्य होणार आहे.