
आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.बुधवारी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी शहर पोलिस स्थानक अंतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय मुस्लिम समाजाने जाहीर केला.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने राहतात. त्यांच्यातील हा सलोखा कायम राहावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीकरांना केले आहे. यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे कौतुक केले. रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल, तर इतर वेळीसुद्धा मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार आहे
बुधवारी पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 3 मे रोजी रमजान ईद, अक्षय्य तृतीया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहात सण साजरे करावे, असे आवाहन डॉ.गर्ग यांनी उपस्थितांना केले.
www.konkantoday.com