परस्पर निर्णयांबद्दल उद्योग खात्याच्या अधिकार्‍यांवर मंत्री उदय सामंत नाराज, अधिकाऱ्यांना लिहिले पत्र


खात्यात होणारा हस्तक्षेप, अधिकार्‍यांनी चालविलेला कारभार यासह महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेत असल्याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची नाराजी सोमवारी उघड झाली.सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांना लिहिलेल्या पत्रात आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, सदर पत्र उघड झाल्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचा खुलासाही उद्योग मंत्र्यांनी केला आहे.उद्योग विभागात तसेच एमआयडीसीत काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेतले जात आहेत. विभागातील धोरणात्मक निर्णय, महत्त्वाच्या कामकाजाविषयी उद्योग विभागाचे प्रधान सचिव तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमित माहिती देण्याची दक्षता घ्यावी, असा इशारा मंत्री सामंत यांनी या दोन अधिकार्‍यांना पत्राद्वारे दिला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये उद्योग विभागात तसेच एमआयडीसीत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय स्तरावर घेतल्याचे माझ्या निर्दशनास आले आहे. यापुढे मला अवगत करूनच असे निर्णय घेण्यात येतील याची दक्षता घ्यावी. महत्त्वाच्या कामकाजाबाबत आणि सादर होणार्‍या प्रस्तावांविषयी मला सचिव, उद्योग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी यांनी नियमित ब्रिफिंग द्यावी, असे सामंत यांनी पत्राच्या सुरुवातीलाच नमूद केले आहे.
नाराजीचा प्रश्नच नाही मंत्री सामंत

मी कॅबिनेट मंत्री आहे, मी उद्योगमंत्री आहे. माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतो, त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. सचिवांवर नाराज आहे, असे कुठेही मी पत्रात म्हटलेले नाही. अधिकारी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. मी उद्योगमंत्री म्हणून पत्रकार परिषदा घेतो त्यावेळी विभागात झालेल्या धोरणात्मक निर्णयांची मला माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मला ब्रिफिंग द्यावे, असे मी पत्रात म्हटले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button