
आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणाने परीक्षेला सामोरे जा भयमुक्त, कॉपीमुक्त संकल्पनेला बळ देण्यासाठी पुढाकार घ्या -पालकमंत्री डॉ. उदय सामंत
*रत्नागिरी, :- उज्वल भविष्यासाठी शिक्षण सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणाने परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी बारावी व दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केले आहे. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी एक पत्र लिहून आवाहन केले आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, प्रिय विद्यार्थ्यांनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत मा. शिक्षणमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वांत मोठा आधारस्तंभ आहे. परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणाने परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे.
भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी.
परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटिबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्याची आपण सर्वजण मिळून प्रामाणिकतेने आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेवूया.