
आंबेत पूल वाहतुकीकरिता बंद केल्याने स्थानिकांची गैरसोय; रो-रो सेवेचा पत्ताच नाही
मंडणगड : रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील
हाप्रळ-आंबेत पूल 14 फेब्रुवारी रोजी वाहतुकीसाठी बंद केला. अद्याप या ठिकाणी रोरो सेवा सुरू न केल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. नव्याने झालेल्या समस्येमुळे म्हाप्रळ येथून गोरेगाव येथे दहावी व बारावीच्या परीक्षेला कसे जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. या पुलावरुन चालणाऱ्या वाहनांना रोरो जेटी सेवेचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात कोणतीही सोय झालेली नाही. जेटीची सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नसल्याने या परिसरातील विद्यार्थी व नागरिक यांना धोकादायक स्थितीतील पुलावरून पायी चालत जाऊन प्रवास करावा लागत आहे. मुंबई-पुणेला जाण्यासाठी लांबीच्या मार्गाने माणगाव हे शहर गाठावे लागते. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधला जावा अशी मागणी येथील स्थानिकांतून होत आहे.