
बांग्लादेशी दाखला प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा, माजी आमदार विनय नातू यांची मागणी.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायत येथील बांग्लादेशी नागरिकांना जन्म दाखला दिलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत एका व्यक्तीला जन्म दाखला देण्यात आला होता. सदर व्यक्ती मुंबई पोलिसांनी महत्वाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक केली. चौकशी करत असताना शिरगाव ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीला बांग्लादेशी असतानाही जन्म दाखला दिल्याचे पुढे आले.
या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये असू शकतात. बांधकाम व्यवसाय, मच्छिमार व्यवसाय यामध्ये अनेक बांग्लादेशी आहेत. कोकण विभागाची एक स्वतंत्र विशेष तपास समिती निर्माण करावी किंवा नाशिक येथे निर्माण केलेल्या विशेष तपास समितीकडे कोकण विभागाचे कामही सोपविण्यात यावे, अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.www.konkantoday.com