मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात टँकरमधील रसायन गळतीपुळे दुचाकींचा अपघात.
मुंबई-गोवा महामार्गावर रसायनवाहू टँकरला गळती लागून सांडलेल्या रसायनामुळे परशुराम घाटात चार-पाच दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त वाहनचालकांनी या टँकरचा पाठलाग करून तो सवतसडा धबधबा परिसरात थांबवल्याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात दिली. टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. या घटनेत चार दुचाकीस्वार जखमी झाल्याचे वृत्त आहे.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यातून रसायन भरलेला टँकर चिपळूणच्या दिशेने येत असतानाच परशुराम घाटात या टँकरला अचानकपणे गळती लागली. त्यातून चिकट स्वरुपाचे रसायन महामार्गावर सांडण्यास सुरूवात झाली. त्याचवेळी या टँकरच्या मागून येत असलेले दुचाकीस्वार या रसायनावरून घसरून पडू लागले. एकापाठोपाठ घडलेल्या अपघातात तीन-चार दुचाकीस्वार जखमी झाले. अखेर सुरक्षिततेच्यादृष्टीने शिवाय पुढील अपघात रोखण्यासाठी काही वाहनचालकांनी त्या टँकरचा पाठलाग सुरू केला.
तोपर्यंत हा टँकर परशुराम बस थांब्यापासून पुढे सवतसडा धबधब्यापर्यंत आला होता. सवतसडा धबधबा येथे टँकर थांबवल्यानंतर संतप्त वाहनचालकांनी थेट टँकर चालकावर हल्लाबोल चढवला. त्याला चांगलेच फैलावर घेत तीव्र संताप व्यक्त केला.www.konkantoday.com