मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर
निर्मला सीतारामन यांच्या आठव्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.तसेच 4 वर्षांचे आयटी रिटर्न एकत्र दाखल करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगावरील औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली. येत्या 3 वर्षात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. अशी 200 केंद्रे पुढील आर्थिक वर्षातच बांधली जातील. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, अशा बिहारवरही सरकारचे लक्ष होते. सीतारामन यांनी बिहारसाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. राज्यात आयआयटीचा विस्तार होईल. मखाना बोर्ड आणि 3 नवीन विमानतळ देखील बांधले जातील. सरकारने 7 जाचक दर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त 8 टॅरिफ दर राहतील. समाजकल्याण अधिभार काढण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते आणि यावेळी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काही दिलासादायक पावले उचलणे अपेक्षित होते. सोप्या शब्दात सांगायचे तर, यावेळी इतर सर्व फायद्यांसह आयकर सूट मर्यादा आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. या उपायांमुळे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे.