
रत्नागिरी नगरपालिका आणि उपनगरे चांगल्या प्रकारे साकारली गेल्यास महाराष्ट्रात स्मार्ट सिटी म्हणून रत्नागिरीचे नाव नक्कीच होईल- माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी- भविष्यातील १० वर्षांचा वेध घेत रत्नागिरी पालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत करत माजी आमदार बाळ माने यांनी जिल्हाधिकार्यांचे अभिनंदन केले आहे. नगररचना करून सुनियोजित रत्नागिरी नगरपालिका आणि उपनगरे चांगल्या प्रकारे साकारली गेल्यास महाराष्ट्रात स्मार्ट सिटी म्हणून रत्नागिरीचे नाव नक्कीच होईल, असा विश्वासही बाळ माने यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असून येथे सर्व कार्यालये, विविध सरकारी आस्थापनांची मुख्यालये आहेत. शहराची लोकसंख्या वाढत आहे. पुढील दहा-वीस वर्षांत या लोकसंख्येला अनुसरून विविध सोयीसुविधा व उपाययोजना करण्याची गरज आहे. एमआयडीसी, शिक्षणसंस्था, घरे, सोसायट्या, कमर्शियल कॉम्प्लेक्स आदींची निर्मिती केली पाहिजे. यासाठी सुनियोजित आराखड्याची गरज आहे. जिल्हाधिकार्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आराखडा चांगला बनवल्यास रत्नागिरीचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
येत्या वर्षभरात पूर्ण होणारा महामार्ग, अनेक सोयीसुविधा यामुळे अनेक पर्यटक रत्नागिरीत दाखल होणार आहेत. त्यांनाही सुनियोजित आराखड्यानुसार सोयी, सवलती, सुविधा दिल्या पाहिजेत. रत्नागिरीतील १५ ग्रामपंचायती हद्दवाढीमध्ये येणार आहेत. त्यांच्या काही समस्या असतील तर त्या त्यांनी शासनाकडे मांडाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनेकांचे हद्दवाढीबद्दल गैरसमज आहेत, त्यामुळे ते शासनाने वेळीच दूर केले पाहिजेत, असेही बाळ माने यांनी आवाहन केले.
गावांचा शहरांच्या धर्तीवर विकास होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा आणि भरघोस निधी उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे. त्यानुसार निधी आल्यास विकासकामे करता येतील व ग्रामपंचायतींच्या अडचणी, समस्या सोडवणे शक्य होईल, असेही बाळ माने यांनी सांगितले.
www.konkantoday.com