
ज्येष्ठांनी उतार वयात व्याधी मुक्तीसाठी योगाद्वारे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आचरणात आणावा. साईनगर येथील कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्यात आवाहन
रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल यासारख्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी औषधांऐवजी नियमित किमान एक तास तरी योगाद्वारे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आचरणात आणावा, असे आवाहन कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या साईनगर येथे दिनांक 25 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या मासिक स्नेह मेळाव्यात अनुभव संपन्न ज्येष्ठ नागरिकांनी केले.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री.मारुती अंबरे हे होते. त्यांनी गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून ज्येष्ठांची संघशक्ती वाढविण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छा पत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक श्री. गणपत खामकर आणि सौ. स्मिता साळवी यांनी योगाचे महत्व विशद करून निरामय जीवनासाठी अनुभव कथन केले. श्री. नारायण नानिवडेकर यांनी पूज्य साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म… या प्रार्थनेचे महत्त्व विशद करताना समाजातील दलितांना प्रेमाने जवळ करून माणुसकी धर्म जपण्याचे ज्येष्ठांना आवाहन केले. प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी फेस्कॉमच्या मनोहारी मनो युवा मासिकातर्फे जागतिक महिला दिनानिमित् महिलांसाठी आयोजित निबंध स्पर्धेत महिला सदस्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.
श्री. विनायक हातखंबकर यांनी सेवानिवृत्तांना रत्नागिरी जिल्हा पेन्शनर संघटनेत सहभागी होऊन आपल्यावर अन्याय दूर करण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले दिलीपराव साळवी यांनी भक्ती गीतातून ज्येष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संघटनेचे पदसिद्ध सदस्य श्री श्यामसुंदर सावंत देसाई यांनी फेस कॉम तर्फे ज्येष्ठांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिलीयावेळी संघाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, ज्येष्ठ पदाधिकारी श्री. माधव देवस्थळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजन महिला पदाधिकारी सौ. शुभांगी भावे, सौ. मंगला मारुती अंब्रे, सौ. वृषाली चव्हाण, श्रीमती वंदना कोतवडेकर यांनी उत्तम रीतीने केले. शेवटी श्री. मुकुंद जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. पूज्य साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सुरू झालेल्या या मेळाव्याची सांगता पसायदानाने करण्यात आली.