राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काळबादेवी किनाऱ्यावरील मार्गाचे आजपासून सर्व्हेक्षण सुरू केले
काळबादेवी ते आरे-वारे या सुमारे चार किलोमिटरच्या टप्प्यातून सागरी महामार्ग नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काळबादेवी किनाऱ्यावरील मार्गाचे पोलिस बंदाबस्तात आजपासून सर्व्हेक्षण सुरू केले आहे. या पट्ट्यातून रस्ता उभारण्यासाठी तिन पर्याय तयार केलेले होते. त्यापैकी ग्रामस्थांनी सुचवलेला किनाऱ्यावरील पर्याय निश्चित केला असून उर्वरित दोन पर्याय तात्पुरते रद्द केल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. हे सर्व्हेक्षण दोन आठवडे सुरू राहणार आहे.रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम वेगाने सुरू झाले आहे. काळबादेवी येथील खाडीवरील पूल बांधण्यात येणार आहे. त्याचा ठेकेदारही निश्चित झालेला आहे. पुढील रस्त्याबाबात एमएसआरडीसीतर्फे स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली होती.
काळबादेवी गावातून रस्त्यासाठी दोन पर्याय ठेवलेले होते. त्यामध्ये शेतजमिन आणि काही लोकांची घेर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी काळबादेवी किनाऱ्यावरून आरे-वारेपर्यंत मार्ग न्या अशी सुचना केली होती. ग्रामस्थांनी सुचवलेला पर्याय निश्चित करून एमएसआरडीसीतर्फे आजपासून सर्व्हेक्षण सुरू केले आहे. एमएसआरडीसीचे अधिकारी अजय झा यांनी आज सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत परिसराची पाहणी केली. हा मार्ग काळबादेवी किनाऱ्यावरील दर्ग्यापासून धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या बाजूने आरे-पुलापासून तिनशे मिटर आधी बाहेर पडणार आहे. पिलरवरून पुलाप्रमाणे रस्ता बांधण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना प्रशासनाकडून सांगण्यात आले.