
रत्नागिरी जिल्ह्याचे लवकरच विभाजन,मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता.
राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० ला झाली. त्या वेळी राज्यात फक्त २५ जिल्हे होते. नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासनिक गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. २०१४ ला ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता. सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.