
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्क्यांपेक्षा जास्त जमीन भात लागवडीखाली
रत्नागिरी : 20 टक्क्यांंपेक्षा जास्त भात जमीन गेल्या वर्षाच्या तुलनेत लागवडीखाली आली आहे. कोकणात पावसाची वाटचाल गतवर्षाच्या तुलनेने पीछाडीवर असली तरी पावसाच्या सुरवातीच्या हंगमात चांगला पाऊस झाल्याने भात लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामातही वेग आला. त्यामुळे लागवड क्षेत्रात वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे. यावर्षी बर्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे भाताबरोबर नाचणीच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कृषी विभागाच्या पाहणीनुसार यावर्षी कोकणातील जिल्ह्यात भात लागडवडीत 20 टक्के तर नाचणीच्या लागवड क्षेत्रात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोकणात प्रामुख्याने भात शेती केली जाते आणि या पिकासाठी पाणी अत्यावश्यक आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. आता पाऊस समाधानकारक आहे, पण मध्येच पावसाने हुलकावणी दिली, तर पिकाला रोगाची लागण होऊ शकते. पाऊस पडला नाही तर अनेक किडींचे अतिक्रमण होत असते. जर किडींचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादनात घट होण्याची शक्यता अधिक असते. मात्र सध्यातरी जिल्ह्यातील पीकस्थिती समाधानकारक असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्हाडे यांनी दिली.